श्रीगुरुचरित्र हा एक मराठी भाषेंतील ग्रंथ आहे. अनेक प्रकारची संकटे तसेच प्रापंचिक अडचणी दूर व्हाव्यांत म्हणून पुष्कळ जण श्रीगुरुदेव दत्त भक्त या ग्रंथाची पारायणे करत असतात.
गुरुचरित्र हे शिष्य नामधारक व गुरु सिद्ध यांच्या संवादाचे भक्तिपूर्ण प्रकटीकरण आहे. गुरुचरित्र हा ग्रंथ सरस्वती गंगाधर यांनी लिहिला आहे.
गुरुचरित्राचे अध्याय: गुरुचरित्राचे एकंदर बावन्न अध्याय आहेत.
पारायणाच्या पद्धती: पारायण हे सामान्य भक्त सात दिवसांचे करतात. तरी एक दिवसाचे किंवा तीन दिवसांचे पारायण करणारेहि काही भक्त आहेत. शुभ दिवशी, शुभ वेळी पारायण सुरु करावे. दत्तजयंतीच्या आधी दत्त जन्मापर्यंत पारायणासाठी दिवस शुद्धी बघण्याची आवशकता नसते.
पारायणासाठी साहित्य: गुलाबाची फुले, हार, तुळशी, सुगंधी उदबत्ती, धूप, कलश, विड्याची पाने, नैवेद्यासाठी पेढे, अष्टगंध, हीना अत्तर, रांगोळी, तीन पाट, नारळ
पारायणाची पूर्वतयारी : पारायणाला शुचिर्भूत शरीराने व मनाने बसावे. आंघोळ करून संध्यादि व देवांची पूजा करावी. देवाला व घरांतील वडिलधार्यांना नमस्कार करावा. पारायणाला बसण्याची जागा स्वच्छ करून, रांगोळी घालून तीन पाट अगर आसने मांडावीत. दोन आसने समोरासमोर मांडावीत व एक आसन बाजूस मांडावे. वाचणार्याचे तोंड पूर्वेस अगर उत्तरेस असावे. आपल्या समोर चौरंगावर श्री गुरुदेव दत्तांची तजबीर ठेवावी. त्याची पूजा करून हार घालून समोर गुरुचरित्राची पोथी घेऊन पोथीचीही पूजा करावी. कलश स्थापना व त्याचे पूजन करावे.तुपाचे निरांजन सतत समोर तेवत असावे. सातही दिवस वाचनाची जागा एकच असावी. पारायण कशासाठी करत आहोत त्याचा उच्चार करून संकल्प सोडावा व वाचनाला सुरवात करावी. वाचन मोठ्यानेच करावे मनांत करू नये. पारायण चालू असताना फोन/मोबाईल बंद ठेवावा. कोठच्याही प्रकारचे बोलणे पारायण चालू असताना करू नये. वाचन सुरु असताना एकाग्रता अतिशय महत्वाची आहे. वाचनांत एकाग्रतेने मनाने एकरूप व्हावे. काही विशिष्ट परिस्थितींत एकेका अध्यायाचे पारायण करण्याचीही प्रथा आहे.
प्रत्येक दिवशी अध्यायांचे वाचन:
पहिल्या दिवशी: १ ते ७ अध्याय
दुसर्या दिवशी: ८ ते १८ अध्याय
तिसर्या दिवशी: १९ ते २८ अध्याय
चौथ्या दिवशी: २९ ते ३४ अध्याय
पाचव्या दिवशी: ३५ ते ३७ अध्याय
सहाव्या दिवशी: ३८ ते ४३ अध्याय
सातव्या दिवशी: ४४ ते ५२ अध्याय
अशा प्रकारे सात दिवसांचे पारायण करावे. प्रत्येक दिवशी वाचन झाल्यावर नमस्कार करून उठावे. काहीतरी खावे. दिवसभर शुद्ध मनाने राहावे व रात्री भूमीवर शयन करावे. ब्रह्मचर्याचे पालन पारायण चालू असताना करावे. सात दिवस पारायण झाल्यावर अनुष्ठान म्हणून ब्राह्मण सुवासिनीला भोजन-दक्षिणा द्यावी. जेवणांत पुरणपोळी व घेवड्याची भाजी अवश्य करावी. अशा रीतीने पारायण पुरे करावे.
अध्यायांचे महत्व: संपूर्ण ग्रंथाचे पारायण करणे अशक्य असेल तेव्हां आपल्या अडचणीनुसार फक्त विशिष्ट अध्यायाचेच पारायण करण्याचीही प्रथा आहे.
अध्याय १ : सद्गुरू प्राप्तीसाठी वाचावा.
अध्याय २: श्रीगुरुकृपा व्हावी म्हणून वाचावा.
अध्याय ४: श्रीदत्त जन्माचा अध्याय.
अध्याय १३: उत्तम आरोग्य प्राप्ती व्हावी व रोग मुक्तीसाठी वाचावा.
अध्याय १४: प्रापंचिक अडीअडचणी दूर व्हाव्यांत म्हणून वाचावा.
अध्याय १८: दारिद्र्य दूर व्हावे म्हणून वाचावा.
अध्याय २० व २१ : संततीच्या आरोग्यासाठी म्हणून वाचावा.
अध्याय ३९ : संतती प्राप्तीसाठी म्हणून वाचावा.
अध्याय ३९ चे पारायण करण्याआधी श्लोक म्हणावा.
नमस्ते योगिराजेंद्र दत्तात्रेयदयानिधे I
षष्ठीवर्ष वयस्कायाः वंध्यायाः पुत्रदानवान् II
तद्वन्मेयि कृपाकृत्वा श्रीशंभक्तं चिरायुषं I
देहि मे तनयं दत्त त्वामहं शरणागतः II
श्रीमद्वासुदेवानन्द सरस्वती टेंबे स्वामीमहाराज यांनी श्रीगुरूचरित्रावर संस्कृतमध्ये द्विसाहस्री, श्रीगुरुसंहिता हे ग्रंथ आणि त्रिशति गुरुचरित्र काव्य लिहिले आहेत. त्यांनी मराठीमध्ये सप्तशती गुरुचरित्र हा ग्रंथ लिहिला आहे.
पारायणाचे लाभ: गुरुचरित्र पारायणामुळे आरोग्य, पुत्रप्राप्ती, संतती, धन, ऐश्वर्य, सुख, समृद्धी, सर्व संकटांचे निवारण, भूतबाधा व करणी यांपासून मुक्तता, रोगापासून सुटका होऊन सुदृढ आरोग्य लाभणे,पारमार्थिक गुरुकृपा, सद्गुरुप्राप्ती, जीवनांत शांती आणि अंती मोक्ष अशा अनेक प्रकारचे लाभ होतात.
अशा रीतीने श्रीगुरुचरित्र हा प्रासादिक ग्रंथ सध्याच्या तणावग्रस्त जीवनांत आपल्यासाठी एक प्रकारची संजीवनी देणारा आहे. अशा या श्रीगुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाने दत्तभक्तांचे सर्व प्रकारचे शुभ मनोरथ पूर्ण व्हावेत आणि त्यांच्या जीवनांत सुख, शांती आणि समृद्धी यांचा लाभ व्हावा हीच श्री गुरुदेव दत्त चरणी प्रार्थना.
🙏🏻🙏🏻🌺
उत्तर द्याहटवा